Wednesday, October 12, 2016

एका पावसाची कहाणी

एकदा बादशहाला कुणीतरी विचारलं, "सत्ताविसातून नऊ गेले तर किती उरतात?" बादशहाने बिरबलाला विचारलं तर तो म्हणाला "शून्य!"

बादशहा (नेहमीप्रमाणेच) चक्रावला आणि आकडेमोड करत बसला; पण उत्तर काही जुळेना. शेवटी बिरबलानेच सांगिंतलं, "एकूण नक्षत्रे सत्तावीस, त्यातील पावसाची नऊ. जर पाऊसच पडला नाही तर उरणार काय?"

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

मे महिन्यातला सूर्य अख्ख्या भारतवर्षाला जाळत होता. धरतीची लाहीलाही होत होती. सगळे प्राणिमात्र तहानेने व्याकुळ झाले होते. अचानक आभाळ दाटून आलं आणि एका मुसळधार सरीने (काही काळापुरतं तरी) धरतीला शांत केलं. खरंतर मॉन्सूनला अजून अवकाश होता. पण मृगाच्या पावसापूर्वीच रोहिणीच्या सरीने हजेरी लावली. जणू भावाच्या जन्मापूर्वी झालेलं बहिणीचं आगमन!

भावाच्या आधी बहिणीचा पाळणा
मृगाच्या आधी रोहिणीचा गुळणा

बहिणीने हजेरी लावली खरी; पण थोड्यावेळापुरतीच. शेवटी माहेरवाशीणच ती. तिचं काम मधून-अधून भेट द्यायचं. खरं लक्ष दुसरीकडेच! ते काम धाकट्या भावाचं...

तो आला जूनच्या दुसऱ्या आठवड्यात. सगळं आभाळ ढगांनी व्यापून गेलं. हवा एकदम गार झाली आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सरीवर सारी बरसू लागल्या. मृगाचं वाजत-गाजत आगमन झालं होतं!

घाटाच्या पश्चिमेला, निमुळत्या कोकणपट्टीत धबाबा तोय आदळू लागलं. कोसळलेल्या पाण्याचे लोंढे वसिष्ठी, सावित्री अशा नद्यांमधून समुद्राकडे परतू लागले.

इकडे घाटमाथे तर काळ्याशार दाट ढगांमध्ये गुरफटून गेले होते. धो-धो पडणाऱ्या पावसामुळे इथली सदाहरित जंगलं अधिकच हिरवीकंच होत होती. कोयनेच्या जंगलात जळवांचा बुजबुजाट सुरु झाला. भीमाशंकरची शेकरं, कोयना-चांदोलीची अस्वलं, राधानगरीचे गवे आणि आंबोलीचे साप पावसापासून लपायला आसरे शोधू लागले. इथेच उगम पावणाऱ्या कृष्णा, कोयना, भीमा, नीरा या पूर्ववाहिनी नद्या आता गढूळ पाण्याने भरून वाहू लागल्या आणि त्यांच्यावर बांधलेल्या धारणांपाशी थबकल्या.

मृग नक्षत्राबरोबर आता मॉन्सूनही पुढे सरकला. दख्खनच्या पठारावर अमृतधारा वर्षू लागल्या. इथला पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस तसा हलकाच; पण हा प्रदेश कृष्णा, भीमेच्या कृपेने उन्हाळ्यातही तसा हिरवा होता. आता अधिकच हिरवा झाला.

तिकडे पूर्वेला विदर्भ उष्णतेच्या लाटांनी चांगलाच होरपळला होता. आता मात्र तिथे पावसाला सुरवात झाली. हा भाग भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यावर; त्यामुळे कधी अरबी समुद्रावरून तर कधी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे धुंवाधार पाऊस पडू लागला. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, प्राणहिता या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. चंद्रपूर, गडचिरोलीची साग, साल आणि बांबूची जंगलं आता आणखीनच दुर्गम झाली.

जूनचा शेवट आला. एव्हाना आर्द्रा नक्षत्र सुरू झालं होतं. पण महाराष्ट्राचा एक मोठा पट्टा अजूनही कोरडाच होता, नाशिक-नगरपासून मराठवाड्यातपर्यंत पसरलेला. हे होतं गोदावरीचं खोरं.

गोदावरी तशी भली-मोठी पूर्ववाहिनी नदी. महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशापर्यंत पसरलेली. पण कृष्णा-भीमेसारखं या नदीला 'खात्रीशीर' पावसाचं वरदान नसावं. या खोऱ्याच्या दक्षिणेला, लातूर परिसरात तर परिस्थिती आणखीच वाईट. सगळा प्रदेशच  पर्जन्यछायेचा.

तीच गत पश्चिमवाहिनी तापीच्या खोऱ्याची. खान्देशची काळी, कसदार जमीन जणू कापूस आणि केळ्यासाठीच बनलेली. पण इथला उन्हाळा विदर्भासारखा आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य मराठवाडयासारखं! त्यामुळे सगळेच चातकासारखे पावसाची वाट पाहात होते.

सरते शेवटी जुलै उजाडला. पुनर्वसू नक्षत्र सुरु झाला आणि वरुणराज प्रसन्न झाला. गोदा आणि तापीही भरून वाहू लागल्या. खान्देश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, सगळीकडचं रान आबादान झालं.  अशातच पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा नक्षत्रे सरली.

आता ऑगस्ट आला, म्हणजे मघा नक्षत्र. हा तर पावसाळ्याचा मध्य, सर्वात महत्वाचा. या नक्षत्राची एक गंमत आहे.

न पडतील मघा, तर ढगाकडे बघा
आणि पडतील मघा, तर चुलीपुढे ह*!

जेंव्हा मघा नक्षत्र कोरडं जातं, तेंव्हा आपल्या हाती फक्त आकाशाकडे बघायचं उरतं. आणि जेंव्हा धो-धो बरसतं, तेंव्हा? महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणंही शक्य होत नाही! यावर्षी तसंच झालं! असो.

आता मात्र दिवस वेगाने पुढे सरकत होते. पूर्वा-उत्तरा नक्षत्रेही सरली. सप्टेंबरच्या शेवटी हस्त नक्षत्र आलं. मराठवाड्यात हत्तीच्या सोंडेतून दिल्यासारखा पाऊस पाडून गेलं. धरणं पूर्ण भरली. कोकणातला भात, पश्चिम महाराष्ट्रातला ऊस, मराठवाड्यातलं सोयाबीन, विदर्भातला कापूस आणि खान्देशातली केळी... सगळीकडे आबादी-आबाद झाली.

आता आला ऑक्टोबर. म्हणजे मॉन्सूनचा शेवट. पंजाब-राजस्थानातून परतीचं वारं वाहू लागलं. हे चित्रा नक्षत्र भातासाठी महत्वाचं.


न पडतील चित्रा, तर अन्न मिळेना पितरा
पडतील चित्रा, तर भात खाईना कुत्रा

पाऊस नाही पडला तर पिंडदानासाठीही भात मिळणार नाही. आणि पडला तर इतकं भरघोस पीक येईल की कुत्रासुध्दा भात खाऊन कंटाळेल. यावेळी मात्र पर्जन्यराजाने मनावरच घेतलं. भाताचं मायंदाळ पीक आलं.

पाऊस संपला, सुगी झाली. सगळीकडची दिवाळी आनंदात साजरी झाली. आणि पुन्हा एकदा त्याने धावती भेट दिली. यावेळी मात्र पुढच्या पिकांसाठी, रब्बीच्या. नक्षत्र होतं स्वाती आणि त्या पावसाने पिकवले माणिक-मोती!

अशा प्रकारे साठा उत्तराची पावसाची कहाणी पाचा उत्तरी पूर्ण झाली!

Monday, December 16, 2013

अस्थंबा

महाराष्ट्राच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेल्या सात डोंगररांगा अहेत. एकमेकांना समांतर जाणारी ही सात पुडं (ranges) म्हणजेच सातपुडा पर्वत. याच पर्वताच्या सुदूर पश्चिमेला नंदुरबार जिल्हा आहे. अरबी समुद्रावरून येणारं बाष्पयुक्त वारं इथल्या पर्वतरांगांवर आदळतं आणि मुसळधार पाऊस पाडतं. त्यामुळे इथल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये घनदाट जंगल आहे. भिल्ल, पावरा, तडवी, पाडवी हे आदिवासी इथले रहिवासी.

याच भागात आहे अस्थंब्याचा डोंगर. हा डोंगर चढायला तसा अवघडच. आजूबाजूला खोल दऱ्या, त्यामध्ये निबिड अरण्य आणि चढायला निमुळती पायवाट. असल्या धोकादायक वाटेकडे एरवी सहसा कुणी फिरकत नाही. पण दरवर्षी दिवाळीत मात्र इथे जत्रा भरते. दूरदूरचे आदिवासी बांधव इथे आवर्जून हजेरी लावतात.

भल्या पहाटे, खरं तर मध्यरात्री, हातात मशाल घेऊन डोंगर चढाई सुरु होते. गुडुप अंधारात, खोल खाईच्या कडेने, तोल सांभाळत डोंगर चढायचा म्हणजे येरा गबाळ्याचं काम नाही. पण इथे तर सगळे निर्धास्तपणे चालत असतात. सगळ्यांना खात्री असते की ते डोंगरावर सुरक्षित पोचणार आहेत. कुठलीतरी अदृश्य शक्ती त्यांची काळजी घेणार आहे. आणि समजा कुणी वाट चुकलाच तर…?

अंधारातून एक जख्ख म्हातारा काठी टेकत येतो. त्याचं शरीर कंप पावत असतं, चेहरा सुरकुतलेला असतो आणि डोक्याला फडकं गुंडाळलेलं असतं. चुकलेल्याला तो धीर देतो, रस्त्यापाशी आणून सोडतो आणि नकळत आला तसाच दिसेनासा होतो. नंतर कितीही शोधलं तरी तो सापडत नाही! वर्षानुवर्षं हे असंच चाललंय. इतकी वर्षं, खरं तर इतक्या पिढ्या झाल्या तरी तो म्हातारा आहे तसाच आहे. जख्ख, सुरकुतलेला आणि कंप पावणारा…

त्या म्हाताऱ्याचं नाव आहे अस्थंबा, म्हणजे अश्वत्थामा… महाभारतातला!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा आणि दुर्योधनाचा मित्र. त्याच्या कपाळावर एक मणी होता. युद्ध संपल्यावर, सूडाच्या भरात त्याने मध्यरात्री पांडवांच्या शिबिरावर हल्ला केला आणि द्रौपदीच्या मुलांना झोपेतच ठार केलं. याची शिक्षा म्हणून श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतला आणि त्याला अमरत्वाचा शाप दिला!

तेव्हापासून अश्वत्थामा भटकतोय… कपाळावरची भळभळती जखम घेऊन, असह्य वेदना सोसत, आणि एकटेपणाचं जिणं जगत… त्याच्या वेदनांना अंत नाही, कारण त्याला मृत्युचं वरदान नाही! सगळे त्याला झिडकारतात आणि तो रानोमाळ भटकत रहातो…एकटाच!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

महाभारतातला अश्वत्थामा खरंच होऊन गेला का? बहुधा असावा. तो खरंच चिरंजीव आहे का? नसावा. निदान आजवरच्या शास्त्रीय माहितीनुसार तरी… पण जर अश्वत्थाम्याकडे एक व्यक्ती म्हणून न पहाता एक तत्त्व म्हणून पहिलं तर…?

आपल्या आजूबाजूला नीट बघितलं तर अनेक अश्वत्थामे दिसतील. शरीराने जर्जर, मनाने खचलेले. त्यांना जिणं असह्य झालंय पण मृत्यू काही येत नाही! मग मात्र जाणवेल की अश्वत्थामा नक्कीच चिरंजीव आहे! असो…

महाभारतातल्या अश्वत्थाम्याने सातपुड्यात आल्यावर मात्र स्वतःचा उःशाप स्वतःच शोधला! एकटेपणाच्या शापावर मात करत तो आदिवासींमध्ये मिसळला आणि त्यांचा अस्थंबा ऋषी झाला! आता तो स्वतःच्या जर्जर शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि इतरांना मदत करतो. त्याच्या अनुभवांचा इतरांना उपयोग होतो. स्वतःच्या दुःखाची तमा न बाळगता तो चुकलेल्या वाटसरूला रस्ता दाखवतो. त्याच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याची वाट चुकलेल्या किती तरी लोकांना मार्ग सापडला आहे. आणि म्हणूनच लोक इतक्या दुर्गम ठिकाणी असलेल्या अस्थंब्याचा दर्शनाला जीव धोक्यात घालून येतात!